मित्रानो बघा आपण निवडून दिलेले खासदार दिल्लीत काय काम करत आहेत। ह्या खासदारांची नाव कोणी जाहिर करू शकेल काय? ह्या दांडी बाज खासदारा ना परत बोलवायला नको का? तुमचे काय मत आहे?
सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, December 01, 2009 AT 12:15 AM (IST)
Tags: natioal, new delhi, loksabha, mp, snn
नवी दिल्ली - जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी संसदीय आयुध असलेला "प्रश्नोत्तराचा तास' अनेकदा गोंधळ घालून रद्द करण्याची मागणी होते. त्यामुळे "प्रश्नोत्तराच्या तासाच्या' अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, आज प्रश्न विचारणाऱ्या बहुतांश खासदारांनीच दांडी मारल्यामुळे अवघ्या तीस मिनिटांतच हा तास आटोपता घेण्याची नामुष्की लोकसभेवर ओढवली. तब्बल अठरा वर्षांनी आज प्रश्नोत्तराचा तास स्थगित करावा लागला. तत्पूर्वी लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांनी "प्रश्नोत्तर तासाची अवस्था शोचनीय आहे. यावर आधीच अनेक आघात झाले आहेत' असे सांगत "गोंधळी खासदारांना' शांत करण्याचा प्रयत्न केला होता. गैरहजर मंडळींत कॉंग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांचे खासदार होते. त्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांनी "खासदारांनाच रस नसेल तर प्रश्नोत्तराचा तास रद्दच का करु नये', असा उद्विग्न सवाल केला. लोकसभेच्या कामकाजाची सुरवातच आज डाव्या पक्षाच्या खासदारांच्या गोंधळाने झाली. डाव्या खासदारांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी केली. त्यावर मीराकुमार यांनी "प्रश्नकाळाची दुरवस्था असून, यापूर्वीही त्यावर वारंवार आघात झाले आहेत. त्यामुळे तुम्ही शून्य काळात बोला. प्रश्नोत्तराचा तास सुरळीत चालू द्या', अशी विनंतीही केली. तरीही गोंधळ न थांबल्याने त्यांनी प्रश्न पुकारले. कार्यक्रमपत्रिकेवर असलेल्या प्रश्नांपैकी पहिला, दुसरा आणि चौथ्या प्रश्नावरच मंत्री उत्तर देऊ शकले. यातील दोन प्रश्न संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असल्याने राज्यमंत्री पल्लम राजू यांनी, तर ग्रामविकास मंत्रालयाशी संबंधित प्रश्नाला केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांनी उत्तर दिले. त्यानंतर मात्र मीराकुमार या प्रश्न क्रमांक व खासदारांची नावे आणि गैरहजर असल्याची घोषणा प्रश्नपुस्तिकेतील प्रश्न संपेपर्यंत होत राहिली. अखेर साडेअकराला सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. लोकसभेत तारांकित प्रश्नांच्या यादीत सुमारे वीस प्रश्न असतात. त्यासाठी मुख्य व पूरक प्रश्न विचारणाऱ्या दोन खासदारांची नावेही यादीत असतात. प्रत्यक्षात प्रश्नोत्तराच्या तासात पाच ते सातच प्रश्नांवर चर्चा होते. विचारणाऱ्या खासदारांचे प्रश्न, पुरवणी प्रश्न आणि त्यावर इतरही खासदारांचे बोलणे आणि मंत्र्यांचे उत्तर, यासाठी एका प्रश्नावर सरासरी सात ते दहा मिनिटे चर्चा होते. एखाद्या मुद्यावरून वाद निर्माण झाल्यास त्या प्रश्नाला लागणारा कालावधी कधी दहा ते बारा मिनिटांपर्यंत जातो. ज्यांचा प्रश्न सातव्या, आठव्या क्रमांकावर असेल, त्यांना अनेकदा बोलण्याची संधीच मिळत नाही. साहजिकच असे बरेचसे खासदार सभागृहात थांबण्याचे टाळतात. शिवाय, सुटीनंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवसावरही या खासदारांच्या दुर्लक्षाचा परिणाम दिसून येतो. लोकसभेला शुक्रवारी ईद तसेच शनिवारी आणि रविवारीही सुटी होती. लिबरहान आयोगावर उद्या (ता. 1)पासून चर्चा होणार असल्याने आज फारसे काहीही होणार नाही, अशा अपेक्षेने बऱ्याच खासदारांनी दांडी मारली. खासदारांच्या गैरहजेरीमुळे बन्सल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, खासदारांनाच प्रश्न विचारण्यात आणि उपस्थित राहण्यात रस नसेल तर हा तास रद्द का केला जाऊ नये. या हक्काच्या तासात सदस्य सरकारकडून माहिती घेतात. या सर्व प्रक्रियेत करदात्यांचा पैसा खर्च होतो. त्यामुळे या प्रश्नावर गांभीर्याने तोडगा शोधणे गरजेचे आहे. सदस्यांकडून प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याच्या वारंवार होणाऱ्या मागणीवरही नाराजी व्यक्त करताना बन्सल यांनी "रोज कोणीतरी हा तास रद्द करण्याची मागणी करतो. यात माहिती घेण्याऐवजी सदस्यांचे तास बंद कसा करता येईल, याकडेच अधिक लक्ष असल्याचे आढळले आहे''. खासदारांच्या दांड्यांमुळे लोकसभेत यापूर्वी स्थगित झालेला प्रश्नोत्तराचा तास -1) 1883 ---- दोनवेळा 2) 1985 ---- पाचवेळा 3) 1988 ---- तीनवेळा4) 1989 ---- दोनवेळा 5) 1991 ---- एकवेळ32 खासदार गैरहजरप्रश्न विचारून गैरहजर राहणारे 32 खासदार होते. त्यात महाराष्ट्रातील खासदारांचाही समावेश होता.त्यांची नावे अशी संजय धोत्रे (भाजप), एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस), आनंदराव अडसूळ ,भाऊसाहेब वाकचौरे, शिवाजीराव अढळराव पाटील (सर्व शिवसेना)
No comments:
Post a Comment