Friday, July 8, 2011

अजितदादा-राज ठाकरे जुंपली!

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने .........................



मुंबई, ७ जुलै/ विशेष प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खाद्यांवर बंदुक ठेवण्यापेक्षा हिम्मत असेल तर मनसेने माझ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढावीत असे प्रतिआव्हान देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकले. मात्र, अण्णांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला पोहोचवायला आमचे खांदे भक्कम आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी लगावल्याने, आता राज-दादा यांच्यात जुंपणार, अशी चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकात लक्ष न देता आता उपमुख्यमंत्री अजित पवार व छगन भुजबळ यांची प्रकरणे काढली व त्यात लक्ष घातले तर मनसेची संपूर्ण ताकद अण्णांच्या पाठीशी उभी करू असे विधान नाशिक येथील एका कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. या विधानाचा आज अजित पवार यांनी जोरदार समाचार घेतला. मनसेचे बारा आमदार विधानसभेत आहेत. त्यांच्या मदतीने राज यांनी आपली प्रकरणे जरूर विधानसभेत काढावीत असे आव्हानच अजितदादांनी दिले. अण्णांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्यापेक्षा तुमच्या आमदारांना कामाला लावा की, असे सांगून, लोकांना खुष करण्यासाठी असली विधाने करणे सोपे असते असा टोलाही अजितदादांनी राज यांना लगावला. अण्णा हजारे हे देशपातळीवर काम करत आहेत तेव्हा त्यांचे काम त्यांना करू द्या, तुमच्याकडे तेरा आमदार होते. त्यापैकी एकाचे दुर्देवाने निधन झाले आहे. उर्वरित बारा आमदारांकडे तरी माझ्या विरोधातील पुरावे शोधण्याचे आणि माझी प्रकरणे काढण्याचे काम सोपवा असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्यासारख्या व्यक्ती बाहेर अशीच केवळ भाषणे करत सुटतात. लोकांना आवडणारे बोलणे आणि पुराव्यानीशी बोलणे वेगळे असते, असे सांगून मनसेचे आमदार काही कामाचे नसल्याचेच अजितदादांनी अप्रत्यक्षरित्या सुचविले. मुंबईत काँग्रेस व शिवसेनेत सुरु असलेल्या वडय़ाच्या राजकारणाबाबती त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील सारेच प्रश्न सुटले असून केवळ वडय़ाचाच प्रश्न शिल्लक असल्याच्या थाटात प्रसारमाध्यमांकडून याला जी प्रसिद्धी दिली जाते ती अयोग्य असल्याचेही अजितदादा म्हणाले.
दरम्यान अजित पवार यांनी हाणलेला टोला राज ठाकरे यांनीही टोलविला असून, आमचे काम सुरुच आहे, असा इशाराही दिला आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील व मराठी असल्यामुळेच पवार व भुजबळांची प्रकरणे बाहेर काढण्याचे आवाहन त्यांना केले, असे राज ठाकरे म्हणाले. मला दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची गरज नाही, असे वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले. तुम्हाला पोहोचवायला आमचे खांदे भक्कम असल्याचा टोला राज यांनी अजितदादांना लगावला.

No comments:

Post a Comment