Friday, July 30, 2010

आर्थिक स्वार्थापोटीच पालिकेने मलेरियाला दिली मुंबई आंदण

जेव्हा अधिकारी असले निर्णय घेत होते तेव्हा महापालिकेतील सत्ताधारी काय झोपा काढत होते??? एकंदरीत असं दिसतंय कि ह्यांचा अधिकाऱ्यांवर बिलकुल वचक राहिला नाही आणि हे सत्ताधारी आपल्या तुंबड्या भरण्यात मग्न आहेत, मग मुंबईकर मलेरिया नि मरो नाहीतर दुसऱ्या एखाद्या साथीने. ह्यांना त्याचे काय सोयरसुतक?

खालील वृत्त लोकसत्ता च्या सौजन्याने

राज्याच्या एकूण मलेरिया रूग्णांपैकी तब्बल ५७ टक्के रूग्ण एकटय़ा मुंबईत असून त्याची संख्या किमान ४० हजारांवर गेली आहे. पालिकेच्या परंपरागत डास निर्मूलन मोहिमेमुळे आजवर वर्षांला दहा हजारच्या आसपास असणारी मलेरियाच्या रूग्णांची संख्या गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने वाढत असून त्याला महापालिकेतील स्वार्थी अधिकाऱ्यांचा कारभारच कारणीभूत असल्याचे आढळून आहे. एका विदेशी कंपनीला अधिक दराने कंत्राट देण्याच्या नादात पालिका अधिकाऱ्यांनी कमी प्रभावी औषध स्वीकारत मुंबईच मलेरियाला आंदण दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळेच मलेरियाच्या साथीने उच्छाद मांडल्याची धक्कादायक बाब आढळून आली आहे.
शहरात मलेरियाच्या साथीने थैमान घातले असून गेल्या कोही दिवसात ४० लोकांचा बळी गेला आहे. शहराच्या झोपडपट्टी भागात ९० टक्के मलेरियाग्रस्त रूग्ण आढळून आले असून सात प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मलेरियाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. मात्र शहरात डासांची पैदास वाढायला आणि मलेरियाची साथ फोफावायला पालिकेचा कारभारच कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर शहरात डास निर्मुलनासाठी मलेरियल लार्बासाइट ऑइल (एमएलओ) हे इंडियन ऑइल कंपनीने उत्पादीत केलेले ऑईल वापरले जात होते. हे ऑइल फवारल्यानंतर पाण्यावर त्याचा एक प्रकारचा तवंग(थर) तयार व्हायचा. शिवाय तो सात दिवस पाण्यावर साचून राहत असल्याने डासांच्या अंडय़ांना ऑक्सिजन मिळत नसे. त्यामुळे ही अंडी आपोआप नष्ट होत आणि डासांच्या पैदाशीवर नियंत्रण येत होते. विशेष म्हणजे हे ऑइल अवघ्या ७० रूपयाला एक लिटर या भावाने विकत घेतले जात होते आणि त्याची फवारणी कशी करावी याबाबत कर्मचाऱ्यांनाही माहिती असल्याने शिवाय त्याचा सात दिवस थर साचून राहत असल्याने प्रत्यक्षात काय कार्यवाही होते याचीही खात्री करून घेता येत होती.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून या परंपरागत पद्धतीत बदल करण्याची उपरती पालिकेतील काही अधिकाऱ्यांना सुचली आणि एमएलओ ऐवजी व्हेक्टोबॅक हे विदेशातून आयात केलेले ऑइल वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकन कंपनीने तयार केलेल्या या ऑइलचा प्रति लिटर भाव सुमारे तीन हजार ५०० रूपये असून ते जपानच्या एका कंपनीकडून विकत घेतले जाते. दोन वर्षांसाठी १८ कोटी रूपये खर्चून हे ऑईल घेण्यात येत असून ते फवारण्यासाठी तब्बल दहा किलो वजनाचा पंप वापरला जातो. शिवाय तो कसा वापरावा याचे प्रशिक्षणच संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे एवढे वजन घेऊन फवारणी करण्यासाठी कर्मचारी इमारतीवर चढतच नाहीत. त्याचबरोबर या ऑईलच्या फवारणीनंतर डास मरतात का याचीही खातरजमा करता येत नाही. त्यामुळे या ऑइलची उपयुक्तता कळत नाही, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे व्हेक्टोबॅक हे ऑईल खरेदी करण्यासाठी एमएलओ हे ऑईल पर्यावरणास घातक असल्याची आवईही पालिकेच्याच अधिकाऱ्यांनी उठविली अशी माहितीही सूत्रांनी दिली.

    No comments:

    Post a Comment