Tuesday, May 4, 2010

राज ठाकरे यांचा मोटरमनना इशारा

ज्या पद्धतीने मोटर मनने मुंबई करांना वेठीस धरले आहे ते बघून तर कोणीही मुंबई कर संतप्त होणारच ..... काल सकाळी त्यांनी लोकल चालू दिल्या आणि घरी जाताना बंद केल्या .... ह्यांना कल्पना आहे का कि लोकांना त्याचा किती त्रास होतो? .... आता काही नाही जर ह्यांनी आंदोलन बंद नाही केले तर धरून मारा .... अजून काय, किती वेळ लोकांच्या सहन शीलतेचा अंत बघणार हे लोकं ????

खालील बातमी सकाळ च्या सौजन्याने ......

विनोद


सकाळ वृत्तसेवा

मुंबई- मोटरमनने पुकारलेला संप अत्यंत चुकीचा असून, त्यांनी संध्याकाळपर्यंत संप मागे घेतला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोटरमनच्या विरोधात आंदोलनास उभा राहील. असा सज्जड इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) दिला. मोटरमनच्या मागण्या कितीही रास्त असल्या, तरी आंदोलनाची ही पद्धत चुकीची आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

या विषयावर बोलण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मोटरमन यांच्या संपाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य विषयावर बोलणे त्यांनी या वेळी टाळले.

ठाकरे म्हणाले, मोटरमनच्या मागण्यांविषयी आम्हालाही सहानुभुती आहे. पण, आपल्या मागण्या मांडण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मोटरमननी आपला संप मागे घ्यावा. अन्यथा मोटरमनच्या विरुद्ध मनसे आंदोलनाला उभा राहील. सरकारनेदेखील कठोर पावले उचलून रेल्वे सेवा सुरळित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. ताब्यात घेतलेल्या १७० मोटरमनना संध्याकाळपर्यंत कामावर हजर राहण्यासाठी सोडून दिले पाहिजे.

मोटरमननी एक महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला नोटीस दिली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही, याबाबत विचारता ठाकरे यांनी सरकारला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली. सरकारने वेळीच लक्ष घातले असते, तर आजची परिस्थिती उद्‌भवली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांनीदेखील याचा विचार केला पाहिजे. त्यांच्यावर सरकारने चाप लावला पाहिजे, जेणेकरून अशाप्रकारची अडवणूक थांबेल, असे ते म्हणाले.


Monday, May 3, 2010

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व महाराष्ट्र वासियांना "मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा तर्फे" महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Thursday, April 29, 2010

मनसेतर्फे विभूतींचा महागौरव!

म टा च्या सौजन्याने


म. टा. खास प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मनसेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खाद्यमहोत्सवात ३० एप्रिलला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा आढावा घेणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे अशा महान विभूतींचा गौरवही होणार आहे.

मनसेने अंधेरी स्पोटर्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या खाद्यमहोत्वाची २९ एप्रिलला सांगता होत असून ३० एप्रिल रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचा आढावा घेणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करून महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव जगभरात उंचावणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.

गौरवमूतीर्ंमध्ये रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, साहित्यिक शं. ना. नवरे, अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर, सुमन कल्याणपूर, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ खाडिलकर, केसरी टूर्सचे केसरी पाटील, एन्टरटेन्मेन्ट उद्योगातील अग्रणी संजय गायकवाड आदींचा समावेश आहे.
................

आतषबाजी

मनसेच्यावतीने ३० एप्रिल रोजी रात्री बारा वाजता मुंबईसह पुणे, नाशिक या शहरांमध्ये आतषबाजी करून सुवर्णमहोत्त्सवी वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. हा सुवर्णमहोत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Friday, April 23, 2010

आयपीएलची पाळेमुळे खणाः राज

म टा च्या सौजन्याने



मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

आयपीएलमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे. ते खणण्याचे काम सुरू झाले आहे. असे खणत असताना जर मध्ये कुठे पाइपलाइन आली तर ते काम थांबवू नका, या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केली.

मनसेच्या वतीने खाद्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. आयपीएलमध्ये भ्रष्टाचार होतो आहे म्हणून आयपीएल बंद करणे किंवा क्रिकेट बंद करणे हा उपाय होणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बड्या माशांनाही जाळ्यात अडविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्य सरकारने आयपीएलला करमणूक कर रद्द का केला असा सवाल उपस्थित करत राज म्हणाले, असा कर रद्द करायला हे कोणी सांगितले. ते काय ललित मोदींनी सांगितले नाही. यात पवार यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. हा प्रकार उघडकीस आला नाही तोपर्यंत शरद पवार याच ललित मोदीचे गोडवे गात होते. परंतु आता या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे ते म्हणतात. याचा काय अर्थ होतो. ललित मोदी या व्यक्तीवर अमेरिकेत अमंली पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा दाखल आहे. अशा व्यक्तीबद्दल पवारांना माहित नाही. अशाच पार्श्वभूमीची माणसं यांच्या भोवती कसे जमतात असा सवालही त्यांनी यावेळी केला. प्रफुल पटेल आणि पवार यांच्या राजीनाम्याने काही होणार नाही. केंद्र सरकारने स्वच्छता करायची असेल तर ती मुळापासून करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मला राहून राहून एक प्रश्न पडतो आहे. पवार साहेब म्हणतात की आयपीएलशी माझा काही संबंध नाही. मग राज्य सरकारने आयपीएलवरील करमणूक कर कोणाच्या आदेशावरून रद्द केला. याचे मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी राज्याच्या जनतेला द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रकाश झोतात सामने, राज्यात लोडशेडिंग
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आयपीएलचे सामने झाले. त्यातील बहुतांशी हे प्रकाश झोतात झाले. महाराष्ट्रातील अनेक भागात आज लोडशेडिंग होत असताना महाराष्ट्राच्या सरकारने असे सामने खेळवून त्यांना करमणूक कर का लावला नाही, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

थरूर अफेअर्स मिनिस्टर
थरून हा माणूस एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर नव्हता तर तो अफेअर्स मिनिस्टर होता. रोज उठून नवा वाद, त्यामुळे तो गेला ते बरं झालं. अति हुशार विक्षिप्त माणसं असतात ना त्यातील हा प्रकार आहे.

लता दिदी राजकीय शिबिरात गाणार नाही
लता दिदी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, पण या कोणत्याही पक्षाच्या शिबिरात गाणार नसून त्या १ मे म्हणजे महाराष्ट्रदिनाच्या कार्यक्रमात गाणार आहेत. त्या माझ्या कार्यक्रमातच आल्या होत्या.

कशातही महाराजांचा झटका
कोणालाही महाराजांच्या नावाचा झटका आला तर ते महाराजांबद्दलचे प्रेम होत नाही. त्या झटक्याला आम्ही विरोध केला तर मग आम्ही महाराजांना विरोध करतोय असे ते म्हणतात. माझा पक्ष महाराजांना विऱोध करे असे स्वप्नातही शक्य आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

शिवाजी पार्कच्या कामात लोकांना विश्वासात घ्यावे
शिवाजी पार्क येथे होणा-या कामाबद्दल तेथील नागरिकांना विश्वासात घेवून काम करणे गरजेचे आहे.

मनसेतून त्यांनी खुशाल बाहेर जावे
मनसेमधून कोणी बाहेर पडणार असल्याची मला आताच माहिती मिळाली. त्यांना जर जायचं तर त्यांनी खुशाल जावं, असे राजन राजे यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले.

Monday, April 19, 2010

महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

परवा स्टार माझा वर परळी वैजनाथ वरून पुण्याला जाणाऱ्या जोडप्याला लुटणारी व गाडीत असलेल्या महिलेवर बलात्काराची बातमी पाहिली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. काय चाललाय काय महाराष्ट्रात आणि विशेषता पुण्यात, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत आणि त्यांना पोलिसांचे काहीही भयं राहिले नाही असच एकंदरीत चित्र आहे.

आमचे आर आर आबा तर ह्याला सोडणार नाही त्याला सोडणार नाही अश्या फुशारक्या मारत राहतात पण त्यांचा आणि पोलिस यंत्रणेचा ह्या असल्या गुंडावर वचकच नाही राहिला कारण हेच गुंड ह्या राजकारण्यांना निवडणुकीत मदत करतात आणि मग पूर्ण प्रशासनाला वेठीस धरतात.

पुण्याचे आयुक्त तर अजून वरचढ, त्यांच्या म्हणण्या प्रमाणे अश्या घटना घडत असतात आणि त्या घडतात म्हणून कायदा व्यवस्था धोक्यात आहे अस काही समजण्याची गरज नाही. जर हाच प्रसंग त्यांच्या वर किवा त्यांच्या जवळपास च्या नातेवाईकावर आला तर ते हेच बोलतील का?

परळी वैजनाथ ची घटना हि महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे आणि सरकारने त्यावर त्वरित कारवाई करावी व गुन्हेगारांना शिक्षा होईल ह्याची काळजी घ्यावी म्हणजे झालं.

विनोद


Wednesday, April 14, 2010

शिवसेना-भाजपमध्ये ‘ऑल इज नॉट वेल!’

लोकसत्ता च्या सौजन्याने

ठाणे/खास प्रतिनिधी

आमदार एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रमोशन मिळाल्यानंतर दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रमाणेच संघटनेवर त्यांची मजबूत पकड राहील, ही अपेक्षा फोल ठरत चालली आहे. दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्येही आता जातीयवाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २०१४ मधील निवडणुका जिंकण्यासाठी दलित व मुस्लिमांना पक्षाकडे आकर्षित करण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष करीत असताना पालिका वा संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर ब्राह्मण नेत्यांना बसवून जिल्ह्याचे नेते आपल्याच वरिष्ठांच्या योजनांना सुरुंग लावण्याचे काम करीत आहेत. यामुळे एकंदरीतच सेना व भाजपमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ अशी अवस्था झाली आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनास एकनाथ शिंदे, राजन विचारे व प्रताप सरनाईक हे तिघेही एकाच मोटारीतून जाऊ लागल्याने गटातटात विखुरलेले शिवसैनिकही सुखावले, पण या ‘त्रिमूर्ती’चा हा एकत्रित प्रवास फार काळ टिकला नाही. ‘एकता एक्स्प्रेस’ लगेच शंटिंग यार्डात स्थिरावली.
वास्तविक तीन आमदारांनी एकत्रित शहराचे प्रश्न मांडले तर ते सुटण्यास निश्चितच मदत होईल, पण प्रत्येक जण आपला स्वतंत्र अजेंडा राबवीत आहे. वाढदिवशी शक्तिप्रदर्शन करणे व कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमासाठी आणून ‘मातोश्री’वर कोणाचे वजन जास्त आहे, हे दाखविण्याची स्पर्धाच जणू सेनेत लागली आहे.
दिघे यांच्याप्रमाणे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना मिळाले असले, तरी सर्वाना बरोबर घेऊन जाण्याऐवजी गटबाजीचे राजकारण त्यांनी चालू ठेवले आहे. परिणामी भिवंडी, पालघर, अंबरनाथ, डोंबिवली येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. साईनाथ पवार, उदय बंधू पाटील, प्रा. रवी पाटील यांच्यासारखे पदाधिकारी गमावणे सेनेला भविष्यात महागात पडू शकते.
खासदार संजय राऊत व दगडू सकपाळ यांच्याबरोबरच शिंदे यांच्यावरही नवी मुंबईची जबाबदारी टाकण्यात आली, पण शिंदे यांना नवी मुंबईची वाट बिकट वाटत असल्याने ते अंबरनाथ व बदलापूरकडेच लक्ष देत राहिले . तेथेही युती फिस्कटल्याने त्याचा फटका दोघांनाही बसला. अंबरनाथमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दिवंगत आनंद दिघे कुणालाही सहज उपलब्ध होत असत, पण शिंदे यांच्या दरबारात मात्र ठराविक भाग्यवंतांनाच स्थान मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सरनाईक, विचारे मोबाइलवर तरी सहज उपलब्ध असतात, पण शिंदे यांचा मोबाईल ज्या स्वीय सचिवाकडे असतो तो फोन केला की ‘साहेब मीटिंगमध्ये आहेत’ असे सांगत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जावे तरी कुणाकडे हा प्रश्न सतावीत आहे. सेनेच्या तीनही आमदारांमध्ये सुसूत्रता नसल्याने सर्वसामान्य शिवसैनिक मात्र अस्वस्थ आहे. यातूनच ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत सेनेला फटका बसला. सेनेची जागा राष्ट्रवादीने हिरावून घेतली. सरनाईक यांनी चूक मान्य करून पराभवाची जबाबदारी स्वीकारली तरी अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
पूर्वीच्या महापौर निष्क्रिय होत्या, असी ओरड चालू असे. नवे महापौर अशोक वैती यांनी पहिल्याच मुलाखतीत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची घोषणा केली होती. पण सॅटिस परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाळी यासारख्या रस्त्यांवरील मुजोर फेरीवाले कुणालाच जुमानत नाहीत.
महापौरांनी या परप्रांतीय फेरीवाल्याचा कायमचा बंदोबस्त केला तरी ठाणेकर त्यांना धन्यवाद देतील. सध्या ‘प्रश्न तुमचे, उत्तर महापौरांचे’ यासारख्या सवंग व कालबाह्य उपक्रमात महापौर वेळ घालवत आहेत. त्या अेवजी प्रभाग अध्यक्ष, प्रभाग अधिकारी यांना सोबत घेऊन ‘महापौर तुमच्या प्रभागात’ सारख्या योजना राबविल्या तर ‘ऑन द स्पॉट’ निर्णय होऊन जनतेला दिलासा मिळेल. अधिकाऱ्यांनाही वचक राहील, असे शहरवासियांचे म्हणणे आहे. ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांना तुमच्या सूचनेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे, तुमच्या प्रभागात कचरा साठणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांस दिले आहेत, अशी गुळगुळीत व सरकारीछाप उत्तरे देऊन जनतेला मूर्ख बनवता येणार नाही, हे महापौरांनी ध्यानी ठेवले तरी खूप झाले. आता महापौरांना ‘स्कोडा ’ चे वेध लागले आहेत. बरे झाले भाजपनेच त्यांच्या या हट्टाला ब्रेक लावला. शिंदे यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास पालिका निवडणुकीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.
तीनही पालिकांच्या निवडणुकीत भाजपलाही चांगलाच दणका बसला. नवी मुंबईत हावरेंची हवा चालली नाही. राम पातकर यांच्या कार्यामुळे बदलापूरमध्ये युतीला सत्ता मिळणार आहे. मात्र दुसरीकडे, भाजपचे आमदार संजय केळकर, संघटनमंत्री राजेश देशमुख यांच्यावरही बहुजन समाजातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व नवे प्रदेशाध्यक्ष सुधीर मनगुंटीवार हे दलित व मुस्लिमांना पक्षात आणून त्यांचे गैरसमज दूर करण्याची भाषा करीत आहेत. २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्याची स्वप्ने रंगवीत आहेत. येथे मात्र स्थायी समिती व परिवहन समिती सभापतीपद, शहर अध्यक्षपद ब्राह्मण नेत्यांकडे जाणीवपूर्वक दिले गेले. ज्यांना ही पदे मिळाली ते त्यासाठी लायक असतीलही, पण पक्ष वाढविताना सर्वाचा विचार होणे गरजेचे आहे, असे काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.
‘ब्राह्मणांचा पक्ष’ ही ओळख पुसून टाकण्यासाठी केंद्रीय व राज्य पातळीवर प्रयत्न होताना ठाण्यात मात्र पक्षाचे नेते वेगळीच भूमिका घेत आहेत, याला काय म्हणणार?

अंबरनाथमध्ये मनसेची सत्त्वपरीक्षा ; बदलापुरात म्हात्रेंची अडचण

लोकसत्ता च्या सौजन्याने


ठाणे/प्रतिनिधी ,बुधवार, १४ एप्रिल २०१०
अंबरनाथ आणि बदलापूरच्या नगरपालिका निवडणुका अखेर पार पडल्या. आता साऱ्यांचे लक्ष १० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. अंबरनाथला कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने मनसे, तसेच अपक्षांची भूमिका पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे ठरविणार आहे. बदलापूरमध्ये ३४ जागांपैकी शिवसेना - १२, भाजप- सात यांचे संख्याबळ १९ होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस - १०, काँग्रेस - एक, मनसे - तीन आणि अपक्ष - एक असे मिळून १५ संख्याबळ होते. या आकडेवारीमुळे बदलापुरात पुन्हा युतीची सत्ता येणार हे वरवर निश्चित दिसत असले तरी तिथे वामन म्हात्रेंना नगराध्यक्षपद देण्यास या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध आहे. या मुद्दय़ावर युतीची गणिते बिघडली तर राष्ट्रवादी (१०) भाजप (७) आणि कॉंग्रेस तसेच अपक्ष प्रत्येकी एक असेही एक एकोणीसचे गणित येथील राजकीय वर्तुळात मांडले जात आहे. युतीच्या सत्तेत आपण नगराध्यक्षपदाचे दावेदार असणार का, या प्रश्नावर वामन म्हात्रे यांनी मात्र पक्ष देईल तो आदेश प्रमाण मानू असे ‘वृत्तान्त'शी बोलताना सांगितले, तर नगराध्यक्ष राम पातकर यांनी युतीशिवाय सत्तेसाठी मांडल्या जाणाऱ्या वेगळ्या समीकरणाची शक्यता स्पष्टपणे नाकारली.
अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी (९), रिपाइं (८), कॉंग्रेस (३) असे २० नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यांना बहुमतासाठी सहा इतर नगरसेवकांचे समर्थन आवश्यक आहे. आठ अपक्ष नगरसेवक निवडून आले असले तरी त्यातील चार नगरसेवक शिवसेना समर्थक आहेत. येथे मनसेची भूमिका निर्णायक मानली जात असली तरी त्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर' अशीच आहे. कारण युती अथवा आघाडी कोणत्याही एकास पाठिंबा देणे त्यांच्यासाठी पुढे होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली तसेच मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरे जाताना गैरसोयीचे ठरणारे आहे. हा पुढील राजकीय प्रवास विचारात घेऊन मनसे तटस्थ राहिली तर येथील सत्तेचा पेच अधिकच बिकट होईल. भाजपचे एक मत मिळाले तरीही सेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी नऊ मतांची आवश्यकता लागणार आहे आणि सर्वच अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरला तरी त्यांना एक मत कमी पडत आहे. अशा परिस्थितीत येथे नगराध्यक्षपद तसेच सत्तेसाठी मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष सदा पाटील नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जातात. थोडक्यात, युती आणि आघाडीच्या रस्सीखेचीत मनसेला सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मनसेच्या मतविभाजनाचा कॉंग्रेस आघाडीला फायदा होतो, असा आरोप वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून शिवसेना करीत आली आहे.
लोकसभा तसेच सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी त्यासाठी उदाहरणादाखल दिली जाते. आता प्रत्यक्ष वेळ आल्यावर राज ठाकरे कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे