Monday, June 13, 2011

"भाऊ आपल्याला आमदार बनायचंय" (ब्लॉग)

खालील लेख स्टार माझा च्या सौजन्याने .........




शुक्रवारी दुपारी पुढच्या आठवड्यात कोणत्या स्टोरीज करता येतील याचा विचार करत होतो. पुण्यात पावसाळी वातावरणाची मजा घेण्यासाठी खड़कवासला धरणाच्या किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांमध्ये गर्दी होत असल्याने खडकवासला धरणाच्या चौपाटीची आणि तीथे होणाऱ्या अपघातांची बातमी करावी असं ठरवलं. मोबाईल उचलला आणि रमेश भाऊंना फोन लावला. रविवारी खडकवासल्याला येत असल्याचं सांगून "चौपाटीचा विषय करायचा आहे" अस म्हटलं. वांजळे त्यांच्या नेहमीच्या शैलीत म्हणाले "भाऊ करुयात की ...लई महत्त्वाचा विषय आहे ... कधी येताय...." रविवारी सकाळी ११ वाजता येतो असं सांगत मी फोन ठेवला. काम संपवून संध्याकाळी घरी गेलो आणि आंघोळ करायला बाथरूममधे शिरलो. काही मिनीटं गेली आणि फोन एकसारखा खणखणायला सुरुवात झाली. एकामोगामाग एक कॉल येत होते. तशीच काही महत्त्वाची बातमी असेल अस समजून मी गडबडीत बाहेर आलो आणि फोन उचलला. पलीकडून पोलिस खात्यातील एक मित्र सांगत होता "तुला कळलं का वांजळे गेले ते.. हार्ट अटॅक आल्यावर जहांगीरमध्ये अॅडमिट केलं त्यांना पण ते गेलेत". दुसऱ्या क्षणी माझ्यातला रिपोर्टर आणि मित्र एकाचवेळी जगा झाला आणि कपडे घालून मी जहांगीरकडे धाव घेतली. कॅमेरामनलाही यायला सांगितलं. जहांगीरला पोचलो तेव्हा बातमी पसरुन हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झाली होती. वांजळेंच्या कार्यकर्त्यांमध्ये एकाचवेळी चिंता आणि संताप पसरत होता. काही कार्यकर्त्यांनी न्यूज चॅनेलच्या काही पत्रकारांना बातम्या बंद करा असा दम भरण्याचाही प्रयत्न केला. एव्हाना बातमीसाठी माझा फोनो सुरु झाला आणि वांजळेंबाबत काय बोलायचं हे ठरवताना वांजळेंचा गेल्या दोन वर्षांतला स्वप्नवत वाटणारा प्रवास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत वांजळेंना केवळ पोस्टरवरुनच ओळखत होतो. वांजळेंना पहिल्यांदा पहाणाऱ्याचं त्यांच्याबाबत जे मत व्हायचं ते माझंही झालं. वांजळे खडकवासल्यातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठी तयारीही जोरदार करतायत असं कळत होत. वांजळेंनी धायरीमधे रहाणाऱ्या माझ्या एका मित्राची माहिती काढून मला न सांगता मित्राला मला त्याच्या घरी जेवायला बोलवायला सांगितलं. गौरीचा सण असल्याने पुरणपोळी खायला मी मित्राच्या घरी पोचलो. काही वेळ गेला आणि वांजळेंची अचानक एंट्री झाली. वांजले बसले आणि म्हणाले "भाऊ आपल्याला आमदार बनायचंय". काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली असती पण खडकवासल्याची जागा राष्ट्रवादीला सुटलीय आणि त्यांचा उमेदवार अगोदरच पक्का झालाय. शिवसेनेकडे मी प्रयत्न केला पण तेही ही जागा भाजपला जाणार असल्याच सांगतायत आणि भाजपवाले माझ्या अंगावरच्या सोन्यामुळे आणि माझ्या दिसण्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होइल असं सांगत नाही म्हणतायत. त्यामुळे मी मनसेकडे उमेदवारी मागायचं ठरवलंय. मी म्हटलं ठीक आहे. मनसेची उमेदवारी तुम्हाला फायद्याची ठरेल. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. मी पुरणपोळी खाऊ लागलो. वांजळेंनी मात्र पुरणपोळी बाजूला काढून शिळ्या भाकरीची मागणी केली आणि कटाच्या आमटीसोबत भाकरी कुस्करून खायला लागले. वांजळेंसोबतची ही पहिली भेट...

त्यानंतर काही दिवसातच वांजळेंनी मनसेची उमेदवारी मिळवली आणि प्रचाराला सुरुवात झाली. विरोधी पक्षातील उमेदवार वांजळेंच्या अंगावरील सोन्यावरून त्यांच्यावर टीका करू लागले. वांजळे मात्र अंगावर सोनं कायम ठेऊन प्रचारसभांमधून सांगू लागले की "सोनं त्यांच्या स्वत:च्या कमाईचं आहे आणि कुठली चुकीची गोष्ट करत नसल्यामुळे त्यांना दागदागिने दडवायची गरज नाही". शरद पवारांनीही मनसेचा उमेदवार अंगावर दोन किलो सोनं घालतो अशी टीका केली. पवारांच्या टीकेनंतर मी वांजळेच्या अंगावरील दागिन्यांची बातमी करायचं ठरवंल. निवडणुकीच्या धामधूमीतही "मनसेचा सोनेरी उमेदवार" म्हणून वांजळेंची सर्वत्र चर्चा सुरु झाली आणि पुण्याबरोबराच इतरत्रही वांजळेंबद्दल कुतूहल निर्माण झालं. राज ठाकरेंचा करिष्मा, स्वत:ची जोरदार तयारी आणि सर्वच मिडीयाने 'गोल्डमॅन ' म्हणून दिलेली प्रसिद्धी यामुळे वांजळे पहिल्याच प्रयत्नात ३० हजारांहून अधिकच्या मताधिक्क्याने निवडून आले. निकाल्याच्या दिवशी मतदान केंद्रांवर विजयी उमेदवारांचा कार्यकर्त्यांसह जल्लोष सुरु झाला. मात्र धोतर आणि डोक्यावर राज ठाकरेंचा फोटो असलेला फेटा घातलेले वांजले त्या जल्लोषातही सर्वांच लक्ष वेधून घेत होते. न्यूज चॅनेल्सना बाईट देताना त्यांनी त्यांच्या बायकोला चक्क उचलून घेतलं. राज ठाकरे आणि मतदारांचे आमदार केल्याबद्दल आभार मानले आणि ख़ास विनोदी ढंगात म्हणाले "आणि हो माझ्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्यांचेही धन्यवाद बरं का ...... ते पडले म्हणून तर मी निवडून आलो". वांजळेंना स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याची कला जमली होती.

आमदार झाल्यावर त्यांची गाडी सुसाट सुटली. आमदार बनल्यावर ताठपणा येण्याऐवजी ते काय भाऊ म्हणून सर्वांशी थेट बोलू लागले. निवडणुकीवेळी मिळालेल्या प्रसिद्धीला त्यांनी त्यांना आधीपासूनच मुखोधगत असलेल्या तुकारामांच्या अभंगांची जोड दिली. वांजळेंना पाहण्यासाठी आणि ते भाषणामध्ये गात असलेले अभंग ऐकण्यासाठी गर्दी होऊ लागली. "मै दिखता व्हिलन जैसा हु लेकिन काम हीरो का करता हु" या त्यांच्या डायलॉगला सभांमध्ये टाळ्या पडू लागल्या. पुण्यातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातून वांजळेंना कार्यक्रमांसाठी मागणी येऊ लागली. शहरी तोंडावला असलेली मनसे वांजळेंमुळे ग्रामीण भागातही चर्चेला येऊ लागली. वांजळेंच्या बोलण्याच्या शैलीमुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागात ही वांजळेंची क्रेझ वाढीस लागली. वांजळेंनीही ग्रामीण भागात कार्यक्रमाचा सपाटा लावला.

भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंचं नाव घेतल्यावर वांजळे भाषणांमध्ये अभंग म्हणू लागले. स्वत:वरच विनोद करू लागले. वांजळेंचा फॅन क्लब यामुळे वेगान वाढायला लागला. आजच्या राजकारण्यांबाबत अतिशय दुर्मिळ दिसणार लोकांनी ऑटोग्राफ मागण्याचं आणि फोटोसाठी विनंती करण्याचं चित्र वांजळेंबाबत नेहमीचं झालं. मात्र मिळणाऱ्या या प्रसिद्धीमुळे वांजळे बदलले नाहीत. रोज दुपारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणं आणि शानिवारला फेऱ्या मारणं चुकलं नाही. बोलण्याच्या शैलीतून वांजळे ते गावंढळ आणि भोळे असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत. मात्र ते जे बोलत त्यातून त्यांचं व्यवहारिक शहाणपण समोरच्याच्या लक्षात आल्यावाचून राहत नसे.

जमीन खरेदी विक्री आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा वांजळेंचा व्यवसाय होता. या व्यवसायातून आलेल्या कमाईतून मी सोनं घालतो आणि घातलेल्या सोन्याचं मी रक्षणही करू शकतो हे पहिलवानी छाप वांजळेंचं म्हणणं समोरच्याला पटत असे. एन.डी. ऐ. त ज्यूस सेंटर चालवण्यापासून ते अहिरे गावाचा सरपंच आणि पुढे आमदार बनण्यापर्यंतच्या वाटचालीत आलेल्या आत्मविश्वासाने आपलं म्हणणं दुसऱ्याच्या गळी उतरवण्याची हातोटी त्यांनी साध्य केली होती. राज ठाकरेंचा शब्द हा मनसेमध्ये अंतिम मानला जातो. आपला मुद्दा दुसऱ्यावर ठसवण्याबद्दल राज ठाकरे ओळखले जातात. मात्र आमदार झाल्यावर राज ठाकरेंनी अंगावरील दागिने काढायला सांगूनही वांजळेंनी ते काढले नाहीत. "उलट या दागिन्यांमुळेच मी ओळखला जातो", यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर काहीही परिणाम होणार नाही" हे राज ठाकरेंना पटवून देण्यात वांजळे यशस्वी ठरले.

राज ठाकरेंनीही वांजळेंना समजून घेतलं. त्यामुळे शनिवारी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की "माझ्या या सहकार्याचा मला जेमतेम दोन वर्षांचा सहवास मिळाला पण आम्ही तीस वर्ष एकमेकांना ओळखत असल्यासारखी मैत्री आमच्यात निर्माण झाली". वांजळेंच्या अंत्यविधिला जी गर्दी झाली ती केवळ त्यांच्या अंगावरच्या दागिन्यांमुळे नव्हे तर त्याना मिळालेल्या प्रेमामुळे हे लोक जमा झालेत". राज ठाकरे वांजळेंबाबत लोकांना काय वाटतं ते नेमक बोलले. वडगाव धायरीहून वांजळेंची अंत्ययात्रा निघाल्यावर वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत येइपर्यंत अंत्ययात्रेत मनसे कार्यकर्त्यांबरोबर हजारो नागरिक भर पावसातही सामील झाले ते निव्वळ वांजळेंवरील प्रेमापोटी. कार्यकर्त्यांना हुंदका दाटून येत होता तर वुद्ध स्त्रिया आणि महिलांनी हंबरडा फोडला होता. रडणाऱ्यांपैकी कुणाला वांजळेंनी काशीयात्रा घडवली होती तर कुणाला अजमेर शरीफच्या ख्वाजा गरीब नवाजची यात्रा. सहाजिकच त्यामुळे वांजळेंबरोबर त्यांचे भावनिक बंध निर्माण झाले होते. नकळत डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रुंमधून कळत-नकळत निर्माण झालेले हे बंध उघड होत होते. नियतीपुढे कुणाचं काहीच चालत नाही असं म्हणणारा प्रत्येक जण तरीही उसासा टाकत हळहळ व्यक्त करत होता.

वांजळेंना अखेरचा निरोप देण्यासाठी वैकुंठामध्ये उसळलेली गर्दी न भूतो न भविष्यते होती. आतापर्यंत पुण्यात मोठमोठे साहित्यिक, राजकारणी, गायक, कलाकार, उद्योगपती यांच्या अंत्यविधीला झालेली गर्दी पुणेकरांनी पाहिली होती. मात्र वांजळेंसाठी उसळलेली गर्दी काही वेगळीच होती. आतापर्यंत वैकुंठात एवढी गर्दी पाहिली नव्हती याबद्दल सर्वच पत्रकारांचं एकमत होत होतं. माझं सकाळपासून अंत्याविधीची माहिती देणारे फोनो आणि लाइव्ह सुरु होतं. एव्हाना वांजळेंचं पार्थिव चितेपर्यंत पोहचलं होतं. मान्यवरांचं त्यांना श्रद्धांजली वाहणं सुरु होतं. आमदार रमेश वांजळे अमर रहे या दुमदुमणाऱ्या घोषणांच्या साक्षीने रमेशभाऊंच्या भावाने चितेला अग्नी दिला आणि दोन वर्षांची अतिशय अल्प पण तेवढीच लक्षवेधक कारकीर्द काळाच्या पडद्याआड गेली.

रमेश वांजळेंच्या आठवणींनी आणि त्यांच्या आतापर्यंत केलेल्या बातम्यांनी मनात गर्दी केली. एवढ्यात ऑफिसचा वांजलेंच्या बातमीसाठी फोन आला आणि फोनोसाठी सरळ एंकरशी जोडला गेला. एँकरन विचारलं "मंदार रमेश वांजळेंच्या अंत्यविधीबद्दल ताजी माहिती काय आहे"....... मी क्षणभर आवंढा गिळला आणि सुरु केलं......" मनसेचे खडकवासल्याचे आमदार रमेश भाऊ वांजळे अनंतात.....

1 comment:

  1. वांजळेंचा परिचय करुन देणारा उत्तम लेख. शेवट तर अगदी अप्रतीम आहे.

    ReplyDelete