Monday, October 18, 2010

घराणेशाहीचा विजय असो !!

खालील लेख हा सुहास फडकेंच्या म टा मधील ब्लॉग वरून घेतला आहे

हा लेख खालील लिंक वर देखील मिळू शकतो ....




सुहास फडके Monday October 18, 2010

गेली काही वर्षे, बाळासाहेब सतत, आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे सांगत असतात. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही हेही ते लक्षात घेत नाहीत. खुद्द आदित्य ठाकरे यांचा उदय हा घराणेशाहीचाच एक भाग मानला जाईल.


-शिवसेनेचा हुकुमाचा पत्ता बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, हे विजयादशमीच्या मेळाव्यात पुन्हा सिद्ध झाले. बाळासाहेब येणार नव्हते तेव्हा त्यांच्या भाषणचा व्हिडिओ दाखवण्यात आणि ऐकवण्यात आला होता. अर्थात लाइव्ह बाळासाहेबांची सर त्याला नव्हती हेही खरे. बाळासाहेब नेहमीप्रमाणे बोलले. त्यांचे काही आवडते विषय असतात. त्यांच्यावर तोंडसुख घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. गेली चार वर्षे यात राज ठाकरे यांची भर पडली आहे. आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे सांगताना, कार्याध्यक्षपदासाठी उद्धव यांचे नाव राज ठाकरे यांनीच सुचवले होते, याकडे बाळासाहेबांनी लक्ष वेधले. महाबळेश्वरच्या ज्या अधिवेशनात राज यांनी हे नाव सुचवले तेव्हाच त्यांचे भवितव्य निश्चित झाले होते आणि राज यांनाही आपला भावी प्रवास कोणत्या दिशेने होणार हे कळून चुकले होते. ज्यांना राजकारणाची थोडीफार समज आहे त्यांना राज यांच्यावर नाव सुचवण्याची जबाबदारी टाकण्यामागची गोम बरोब्बर कळली होती.

गेली काही वर्षे, बाळासाहेब सतत, आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे सांगत असतात. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही हेही ते लक्षात घेत नाहीत. मुळात भारतात जवळपास सर्वच पक्षात मुलगा, सून, पत्नी वगैरेंची वर्णी लावली जाते. खुद्द शिवसेनेत, एकाच घरातील पती आणि पत्नी यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याची उदाहरणे आहेत. वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला म्हणून नगरसेवक पत्नीचे नाव घुसवतो. तेथे अनेक वर्षे काम करणा-या कार्यकर्त्यावर अन्याय होतो हे पक्षनेते लक्षातच घेत नाहीत. खुद्द आदित्य ठाकरे यांचा उदय हा घराणेशाहीचाच एक भाग मानला जाईल. त्यांचे नेतृत्व शिवसेनेतील अगदी ज्येष्ठ नेत्यांना मान्य आहे. म्हणून तर राज्यातील आणि केंद्रातील ज्येष्ठ पदे भूषवलेले नेते ते मुंबईच्या पहिल्या नागरिकांपर्यंत सर्व जण आदित्यच्या नावाचा आवर्जून उल्लेख करूनच भाषण सुरू करतात. घराणेशाही आहे म्हणून कोणत्या पक्षात बंड झाल्याचे ऐकिवात नाही. कारण बाकीचे नेते आणि कार्यकर्ते सर्वोच्च पद सोडून बाकीची पदे आपल्याला कशी मिळतील याच्या खटपटीत असतात. खरे म्हणजे शिवसेनेपुढे तातडीचे आव्हान आहे ते, संघटनेत वर्षानुवर्षे पदे अडवून बसलेल्यांना दूर करून तेथे नवीन रक्ताला कसे आणायचे हे!

गेली विधानसभा निवडणूक ही त्या दृष्टीने संधी होती, पण हायकमांडने ती गमावली. दादरमध्ये सदा सरवणकर यांनी बंड केल्यावर पक्षाचे काही वर्षे निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्याला पुढे आणता आले असते. पण तेथे आदेश बांदेकर या टीव्ही स्टारच्या ग्लॅमरला नेतृत्व भूलले आणि बांदेकर तिस-या सथानावर फेकले गेले. आणखी जेमतेम दोन आठवड्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आहे. तेथेही तिकीट वाटपात काही कुटुंबांची मक्तेदारी दिसते. त्याऐवजी पंचविशीतील कार्यकर्ते निवडले असते तर तथाकथित धेंडांनी बंड केले असते पण तरुण पिढी मनसेकडून काही प्रमाणात आपल्याकडे वळवण्यात हायकमांडला यश आले असते.

आदित्य हे युवासेनेचे बॉस बनले आहेत. आता विद्यार्थी सेनेचे काय करणार? ती पण आदित्यच सांभाळणार काय? मुळात आदित्य हे शांत स्वभावाचे वाटतात. शिवसेनेचे आजपर्यंतचे जे स्वरूप जपले गेले आहे ते राखणे हेच त्यांना आव्हान आहे. मुळात महाराष्ट्रातील, मुंबईतील विद्यार्थ्यांपुढे इतक्या मोठ्या समस्या आहेत की त्यांना हात घालण्याचे धाडस आदित्य दाखवेल का? आदित्यने तो ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या सेंट झेवियर्समध्ये विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले नाही. तेथील मराठी वाङ्मय मंडळाशी तो फटकून वागला. आपण मराठी मुलांत वावरतो हे कदाचित त्याला दाखवायचे नसेल. बाळासाहेबांनीच खुद्द आदित्यचा धाकटा भाऊ तेजस याचे शिवतीर्थावर तोंड भरुन कौतुक केले. तो माझ्यासारखा आहे, या त्यांच्या उद्गारातच सारे काही भरलेले आहे. तेव्हा शिवसेनेत घराणेशाही नाही असे म्हणत तेजसचे स्वागत करण्यास तयार व्हा, हाच या मेळाव्याचा संदेश आहे.


3 comments:

  1. शिव सेनेच्या चौकटीत जसे उध्धव बसत नाहीत तसे आदीत्य सुध्धा कीतपत बसतील ह्या बाबत शंका आहे. तुम्ही कुठलाही वारसदार लादला तरी तो जनतेने स्विकारावा लागतो हेच खरे.

    राजच खरा वारसदार पण अता काय करणार दोघेही जण मराठी माणसाच्या नावावर स्वथाचे राजकारण करीत आहेत. देव दोघांना बुध्धी देवॊ अशी आशा करुया.

    ReplyDelete
  2. सुधीरजी, किरण
    धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल ....
    अर्थात हि पोस्ट फडकेंची आहे .. आम्ही फक्त लोकांसमोर मनसे बद्दलच्या गोष्टी आणणारे पोस्ट मन :-)
    एक गोष्ट लक्षात घ्या .. दोन्ही पक्षात वैचारिक फरक आहे ... राज साहेब मराठी लोकांना (मग ते कोणीही असो .. हिंदू / मुस्लीम / दलित ) एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचा राजकारण करीत आहेत तर शिवसेना हिंदुत्वाचं राजकारण करीत आहे ... दोघांमध्ये फरक आहे आणि म्हणून मनसे ह्या पक्षाची एक वेगळी ओळख राज साहेब तयार करू शकले .....

    ReplyDelete