Monday, October 11, 2010

मनसेचे १०० शिलेदार जाहीर!

म टा च्या सौजन्याने ........................................




कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व १०७ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केली. मनसेच्या १०० उमेदवारांची यादी जाहीर झाली असून उर्वरित सात जागांचा फैसला दोन दिवसांत होणार आहे.

या यादीत ३५ महिलांचा समावेश असून फैजल जलाल, उदय समेळ, वैशाली दरेकर, प्रकाश दळवी आणि सुदेश चुडनाईक या केवळ पाच आजी-माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे. उर्वरित ९५ उमेदवार आजवर कधीही महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. विशेष म्हणजे, पक्षस्थापनेपासून सक्रिय असलेले शहरअध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अॅड. सुहास तेलंग, राहुल कामत व संदेश प्रभुदेसाई यांनी तिकीट न मागितल्याने त्यांचा विचार झालेला नाही.

पक्षाने उमेदवारनिवडीत जातीला महत्त्व दिलेले नाही. कमी शिकलेल्या उमेदवारामध्ये जर विकासकामे करण्याची क्षमता असेल, तर त्याला उमेदवारी दिल्याचे राज यांनी स्पष्ट केले. यादीतील ९५ टक्के उमेदवार पक्षाचे कार्यकतेर् असल्याचा दावा करण्यात आला.

निवडणुकीसाठी जाहीरनाम्याऐवजी मनसेेचा 'वचकनामा' असेल व तो लवकरच प्रसिद्ध होईल, असे राज यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, रमेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, कोल्हापूरमध्ये पक्षाची बांधणी समाधानकारकरित्या न झाल्याने तिथे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे म्हणाले.

अतिक्रमणांवरील कारवाईला विरोध

एकीकडे झोपड्यांत राहणाऱ्या परप्रांतीयांना सरकार मोफत घरे देते तर दुसरीकडे कर्ज काढून घर घेतलेल्यांच्या घरावर बुलडोझर फिरवते. सगळेच निर्णय कोर्ट घेणार असेल तर सरकार चालवायचे कसे? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. अनधिकृत घरे बांधून लोकांना फसवणाऱ्या बिल्डर्सना जाब कोण विचारणार, असा सवाल त्यांनी केला.

यापुढे कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांच्या कामाच्या टेण्डरमध्ये, खड्डे पडले तर ते बुजविण्याची जबाबदारी कॉण्ट्रॅक्टरचीच असेल, अशी अट राहील, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment