Wednesday, April 14, 2010

शिवसेना-भाजपमध्ये ‘ऑल इज नॉट वेल!’

लोकसत्ता च्या सौजन्याने

ठाणे/खास प्रतिनिधी

आमदार एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रमोशन मिळाल्यानंतर दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रमाणेच संघटनेवर त्यांची मजबूत पकड राहील, ही अपेक्षा फोल ठरत चालली आहे. दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्येही आता जातीयवाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २०१४ मधील निवडणुका जिंकण्यासाठी दलित व मुस्लिमांना पक्षाकडे आकर्षित करण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष करीत असताना पालिका वा संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर ब्राह्मण नेत्यांना बसवून जिल्ह्याचे नेते आपल्याच वरिष्ठांच्या योजनांना सुरुंग लावण्याचे काम करीत आहेत. यामुळे एकंदरीतच सेना व भाजपमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ अशी अवस्था झाली आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनास एकनाथ शिंदे, राजन विचारे व प्रताप सरनाईक हे तिघेही एकाच मोटारीतून जाऊ लागल्याने गटातटात विखुरलेले शिवसैनिकही सुखावले, पण या ‘त्रिमूर्ती’चा हा एकत्रित प्रवास फार काळ टिकला नाही. ‘एकता एक्स्प्रेस’ लगेच शंटिंग यार्डात स्थिरावली.
वास्तविक तीन आमदारांनी एकत्रित शहराचे प्रश्न मांडले तर ते सुटण्यास निश्चितच मदत होईल, पण प्रत्येक जण आपला स्वतंत्र अजेंडा राबवीत आहे. वाढदिवशी शक्तिप्रदर्शन करणे व कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमासाठी आणून ‘मातोश्री’वर कोणाचे वजन जास्त आहे, हे दाखविण्याची स्पर्धाच जणू सेनेत लागली आहे.
दिघे यांच्याप्रमाणे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना मिळाले असले, तरी सर्वाना बरोबर घेऊन जाण्याऐवजी गटबाजीचे राजकारण त्यांनी चालू ठेवले आहे. परिणामी भिवंडी, पालघर, अंबरनाथ, डोंबिवली येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. साईनाथ पवार, उदय बंधू पाटील, प्रा. रवी पाटील यांच्यासारखे पदाधिकारी गमावणे सेनेला भविष्यात महागात पडू शकते.
खासदार संजय राऊत व दगडू सकपाळ यांच्याबरोबरच शिंदे यांच्यावरही नवी मुंबईची जबाबदारी टाकण्यात आली, पण शिंदे यांना नवी मुंबईची वाट बिकट वाटत असल्याने ते अंबरनाथ व बदलापूरकडेच लक्ष देत राहिले . तेथेही युती फिस्कटल्याने त्याचा फटका दोघांनाही बसला. अंबरनाथमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दिवंगत आनंद दिघे कुणालाही सहज उपलब्ध होत असत, पण शिंदे यांच्या दरबारात मात्र ठराविक भाग्यवंतांनाच स्थान मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सरनाईक, विचारे मोबाइलवर तरी सहज उपलब्ध असतात, पण शिंदे यांचा मोबाईल ज्या स्वीय सचिवाकडे असतो तो फोन केला की ‘साहेब मीटिंगमध्ये आहेत’ असे सांगत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जावे तरी कुणाकडे हा प्रश्न सतावीत आहे. सेनेच्या तीनही आमदारांमध्ये सुसूत्रता नसल्याने सर्वसामान्य शिवसैनिक मात्र अस्वस्थ आहे. यातूनच ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत सेनेला फटका बसला. सेनेची जागा राष्ट्रवादीने हिरावून घेतली. सरनाईक यांनी चूक मान्य करून पराभवाची जबाबदारी स्वीकारली तरी अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
पूर्वीच्या महापौर निष्क्रिय होत्या, असी ओरड चालू असे. नवे महापौर अशोक वैती यांनी पहिल्याच मुलाखतीत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची घोषणा केली होती. पण सॅटिस परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाळी यासारख्या रस्त्यांवरील मुजोर फेरीवाले कुणालाच जुमानत नाहीत.
महापौरांनी या परप्रांतीय फेरीवाल्याचा कायमचा बंदोबस्त केला तरी ठाणेकर त्यांना धन्यवाद देतील. सध्या ‘प्रश्न तुमचे, उत्तर महापौरांचे’ यासारख्या सवंग व कालबाह्य उपक्रमात महापौर वेळ घालवत आहेत. त्या अेवजी प्रभाग अध्यक्ष, प्रभाग अधिकारी यांना सोबत घेऊन ‘महापौर तुमच्या प्रभागात’ सारख्या योजना राबविल्या तर ‘ऑन द स्पॉट’ निर्णय होऊन जनतेला दिलासा मिळेल. अधिकाऱ्यांनाही वचक राहील, असे शहरवासियांचे म्हणणे आहे. ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांना तुमच्या सूचनेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे, तुमच्या प्रभागात कचरा साठणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांस दिले आहेत, अशी गुळगुळीत व सरकारीछाप उत्तरे देऊन जनतेला मूर्ख बनवता येणार नाही, हे महापौरांनी ध्यानी ठेवले तरी खूप झाले. आता महापौरांना ‘स्कोडा ’ चे वेध लागले आहेत. बरे झाले भाजपनेच त्यांच्या या हट्टाला ब्रेक लावला. शिंदे यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास पालिका निवडणुकीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.
तीनही पालिकांच्या निवडणुकीत भाजपलाही चांगलाच दणका बसला. नवी मुंबईत हावरेंची हवा चालली नाही. राम पातकर यांच्या कार्यामुळे बदलापूरमध्ये युतीला सत्ता मिळणार आहे. मात्र दुसरीकडे, भाजपचे आमदार संजय केळकर, संघटनमंत्री राजेश देशमुख यांच्यावरही बहुजन समाजातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व नवे प्रदेशाध्यक्ष सुधीर मनगुंटीवार हे दलित व मुस्लिमांना पक्षात आणून त्यांचे गैरसमज दूर करण्याची भाषा करीत आहेत. २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्याची स्वप्ने रंगवीत आहेत. येथे मात्र स्थायी समिती व परिवहन समिती सभापतीपद, शहर अध्यक्षपद ब्राह्मण नेत्यांकडे जाणीवपूर्वक दिले गेले. ज्यांना ही पदे मिळाली ते त्यासाठी लायक असतीलही, पण पक्ष वाढविताना सर्वाचा विचार होणे गरजेचे आहे, असे काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.
‘ब्राह्मणांचा पक्ष’ ही ओळख पुसून टाकण्यासाठी केंद्रीय व राज्य पातळीवर प्रयत्न होताना ठाण्यात मात्र पक्षाचे नेते वेगळीच भूमिका घेत आहेत, याला काय म्हणणार?

No comments:

Post a Comment