Friday, April 15, 2011

अंबाबाईच्या गाभा-यात स्त्रियांना प्रवेश

खालील लेख म टा च्या सौजन्याने


कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात एका विशिष्ट दिवशी सूर्यप्रकाश आत शिरतो आणि किरणोत्सव होतो... पण त्याहून अनोखा असा किरणोत्सव उद्या होईल... शतकानुशतकांचा अंधार सरेल... कारण अखेर न्याय झाला... पुरुषांप्रमाणेच महिलांनाही अंबाबाईच्या पूजेचा मान मिळाला. आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

गेले काही दिवस राजकीय आदोंलनाचा विषय बनलेल्या या विषयावर निर्णय घेण्यासाठी आजा गृहराज्यमंत्र्याच्या बैठक बोलावली होती. त्यात ही अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यात आली आणि हा निर्णय घेण्यात आला. उद्यापासून या निर्णयाची अंमलबाजावणीही होईल.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, पुरुषांना गाभा-यात जिथंपर्यंत प्रवेश दिला जातो तिथपर्यंत महिलांना प्रवेश देण्यात येणार असा निर्णय घेण्यात आला. तसेच मंदिरात सकाळी देवीच्या अभिषेकालाही महिलांना उपस्थित राहता येईल. महिलांच्या हातून अभिषेकही करता येईल. तसेच सकाळी १० ते ११ : ३० यावेळात महिलांना गाभा-यात प्रवेश देण्यात येणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या महिला कार्यंकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात शिरून देवीची ओटी भरली. परंतु या वेळी मंदिराचे पुजारी आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली होती. तर सनातन प्रभात सारख्या पुराणमतवादी धर्मांध संघटनांनी देखील याला विरोध दर्शवला होता. मात्र हा वाद अधिक चिघळू नये म्हणून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात महिलांना प्रवेश दिला जावा , या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शालिनी ओकयांनी २००० मध्ये उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे सांगून महिलांना डावलले जात होते. मनसे आमदार राम कदम यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली दहा एक महिलांनी बुधवारी गाभारात प्रवेश केला होता. तर गुरुवारी राम कदम यांच्या नेतृत्वाखाली चाळीस महिलांनी गाभा-यात शिरून या प्रथेला मोडीत काढले. त्यानंतर हा वाद अधिक चिघळू नये म्हणून आज बोलावलेल्या बैठकीमध्ये महिलांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानंतर दर्शनार्थी महिलांनी आनंद व्यक्त केला असून उशीरा का होईना पण सरकारला जाग आली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

No comments:

Post a Comment